मोक्ष शेवटाच्या शेवटच्या कविता
मी मरणाच्या दारात उभा राहू इच्छितो
आणि तू आहेस की
आयुष्याच्या नव्या नव्या खिडक्या खुल्या करत सुटलायस
सगळंच प्राप्त झाल्यानंतर
ही कर्तव्याची बाकी असलेली बेरीज
तू मला का दाखवतोयस ?
तुझ्याविषयी जे लिहायचे
लिहून झालंय
जे बोलायचं ते बोलून झालंय
लोकांना ते स्वीकारता आले नाही हा काय माझा गुन्हा
जो तू येतोयस दारात पुन्हा पुन्हा
बहुजनांना स्वतःच्याच माणसांच्याविषयी आत्मविश्वास नाही
आणि दुर्दैवाने प्रचंड करप्शन करणाऱ्या बहुजन लोकांच्यातच जन्मलेल्या नेत्यांनी
त्यांचा न्यूनगंड सार्थक ठरवलाय
ज्याला पटवायला जावं
तो सत्तेन आधीच पटला गेलेला
शैव संघटन बोलावे
तर सगळ्यांच्या बोटी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे
पुरोगामी लोकांना शिवाजी महाराज हवेत पण शिवपार्वती नकोत
ब्राह्मणांनी आकार दिलेला गणपती हवा
लढणारा कार्तिकेय नको खंडोबा नको
इथला पुरोगामी वाद सुद्धा ब्राह्मणांच्या हिशेबात चपखल बसून त्यांच्याच चपलेत पाय ठेवत चालणारा
अर्धवट शहाणे असलेले लोक झुंड बनवतात
आणि गुंडांना नेते म्हणून निवडतात
आता अशा या वातावरणात
कर्मदारिद्र्य माजेल नाहीतर काय
तू आज्ञा देत नाहीस
तोवर हे जग मी सोडू शकत नाही
महादेवा ,दे सिग्नल
एकदा मृत्यू हिरवा झाला कि
या जंगलाला पूर्णविराम मिळेल
श्रीधर तिळवे नाईक
(मोक्ष सिरीज मधील शेवटाच्या शेवटच्या कविता या काव्यफायलीतून)
Comments
Post a Comment